मुंबई : वृत्तसंस्था
टेस्ला, पाणबुडी प्रकल्पासह यापूर्वी अनेक प्रकल्प गुजरातला ओरबडून नेले. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री याबाबत तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. महाराष्ट्राची अशी लूट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले, अशी टीका शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोम्या-गोम्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचे दावे केले जात आहेत. या अनुषंगाने बोलताना राऊत म्हणाले, राज्यातून टेस्ला, पाणबुडी, त्या आधीचे प्रकल्प, हिरे व्यापार गुजरातला गेला. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून ज्या प्रकारे मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, याला विकास म्हणत नाहीत. उपमुख्यमंत्री पवार यांनी राऊत यांचा उल्लेख सोम्या-गोम्या असा केला. त्यावरून राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत, त्यांनी आमच्यावर बोलू नये. तसेच सोमे-गोमे कोण आहेत, हे २०२४ ला कळेल. असे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
जयंत पाटील सरकारमध्ये सामील होत असल्याची चर्चा आहे. राऊत यांनी यावर खुलासा केला. माध्यमातून केवळ अफवा पसवल्या जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते मातोश्रीवर आले होते. त्यांच्याबाबत अशी वृत्त प्रसारित करून गैरसमज निर्माण केला जातो आहे, असे राऊत यांनी सांगितले.