नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.
“आपले माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे.एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची सेवा केली.
“आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले”, असे पंतप्रधान मोदी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच “नरसिंह राव गरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपाययोजनांनी भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुले केले. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते ज्याने भारताला केवळ गंभीर परिवर्तनांद्वारे चालविले नाही तर त्याचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला,” अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.