अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मागच्या दोन टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारताची प्रगती होत असून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत.या गाव चलो अभियानातून आम्ही देखील मतदारांपर्यंत भाजपचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन भाजपचे तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी केले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ३६९ बूथवर भाजपचे गाव चलो अभियान जोरात सुरू आहे.याला गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांनी विविध गावांचा दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते.पाटील यांच्या टीमने सुलेरजवळगे येथे मुक्काम करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी भाजपच्या जुन्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पुढे बोलताना पाटील म्हणाले,मागच्या नऊ वर्षामध्ये मोदी यांनी सर्वसामान्यांना जे अपेक्षित आहे तेच काम केले आहे.राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय, अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटींची योजना,राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह,मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण, ग्रामीण भागातील बेघर भूमीहीनांना घरच्या जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ घरकुल योजना, रामोशी, गुरव, लिंगायत, वडार, धनगर समाजासाठी व संघटित कामगार यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ,रमाई योजना, जलयुक्त शिवार,गडकिल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन यासह अनेक योजना मोदी सरकारने मागच्या नऊ वर्षांमध्ये राबवलेल्या आहेत.
खास करून ग्रामीण भागातील वंचित दुर्बल घटकांसाठी मोदी सरकार अतिशय प्रभावी पद्धतीने काम करत आहे.पीक विमा,पीएम किसान, गॅस सिलिंडर, घरकुल आवास योजना,जन धन योजना,सुकन्या समृद्धी सारख्या अनेक योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर केले आहे,असेही पाटील यावेळी म्हणाले.यावेळी पंडित पाटील,प्रदीप सुरवसे,महेश पाटील,शरणू नागणसुरे, अंबणा डोळळे,श्रावण गजधाने,डॉ.शरणू काळे,आदित्य बिराजदार,नागराज कुंभार,निजप्पा गायकवाड,नागराज पाटील,गौराबाई पाटील,रवी बगले, आप्पासाहेब बिराजदार,निलप्पा बाके, पिरोजी शिंगाडे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










