ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत खालावली

जालना : वृत्तसंस्था

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस होता. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु उपचार घेण्यास नकार देत ते झोपून राहिले. दरम्यान, अंतरवालीत आलेले श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्यासह संत, महंतांच्या आग्रहावरून त्यांना सलाईन लावण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करून अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची तब्येत खालावली. त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. जरांगे-पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला, तरी डॉक्टरांची टीम तेथेच तैनात आहे.

त्यांची तब्येत अधिक खालावू नये म्हणून श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्यासह संत, महंतांनी अंतरवाली सराटी येथे येऊन त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवत जरांगे-पाटलांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी अंतरवाली सराटी येथे ठिकठिकाणाहून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!