मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट काहीसं दूर झालं आहे. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणाऱ्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. राज्यात कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसत आहे. उन्हाची ताप आणि उकाड्यात वाढत होत आहे. किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
येत्या 24 तासांत महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलंच थैमान मांडलं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. आजही राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ झाली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि थंड वाऱ्यामुळे पुन्हा तापमानात अचानक घट झाली आहे. डोंगराळ भागात सुरु असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं हवामानात मोठा बदल झाला आहे.