जालना : वृत्तसंस्था
गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभा करून त्यास निवडून आणू, असा निर्धार राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत केला. दरम्यान, सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसह मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आपण समाजाच्या बैठकीत आपल्या मागणीला पाठिंबा देऊन पाठपुरावा करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातून कुठल्याही जातीधर्माचा एकच उमेदवार देऊन त्याच्यासाठी इमानेइतबारे काम करण्याचा पर्याय मांडला होता. त्यापैकी पहिल्या पर्यायापेक्षा समाजाने दुसऱ्या पर्यायाचा विचार केला.
त्यासाठी समाजबांधवांनी गावागावात बैठका घेऊन सर्वांची मते जाणून घ्यावीत आणि याबाबतचा निर्णय घेऊन ३० तारखेपर्यंत आपल्याला कळवावे, असे आवाहन मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येथे बोलताना केले. अंतरवाली सराटी येथे रविवारी (दि. २४) झालेल्या बैठकीत राज्यभरातून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सरकारने १० टक्क्यांचे दिलेले आरक्षण आम्हाला मान्य नसून, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.
संवाद बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी राजकारण आपला पिंड नसून, मी कुठलीही निवडणूक लढविणार नाही. कुणीही राजकारणात आपल्याला ओढू नये, समाजासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मात्र, राजकारणाशी आपला कसलाही संबंध नाही. फॉर्म भरण्याच्या भानगडीतही मला टाकू नका, तुम्ही तुमच्या पातळीवर सर्वांशी सल्लामसलत करून निर्णय घ्या, असे आवहन केले.