नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडी सनातन धर्म संपवण्याची भाषा करीत आहे. भारतात आणखी एकदा फूट पाडण्याचा त्यांचा मानस आहे. दक्षिण भारत वेगळा करण्याची वक्तव्ये काँग्रेसने केली. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडी ही भ्रष्ट व देशात द्वेष पसरवणाऱ्या शक्तींचा अड्डा बनला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधकांवर हल्ला चढवला. तृणमूल काँग्रेस भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका मोदींनी पुन्हा एकदा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील नवादा व पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये सभा घेतल्या, तर मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये विराट रोड शो घेत प्रचाराचे रणशिंग फुंकले. नवादामध्ये बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कलम ३७० आणि राजस्थानचा काय संबंध, असा सवाल उपस्थित केला. यावरून त्यांची मानसिकता ही टुकडे-टुकडे गँगसारखी असल्याचे स्पष्ट झाले. खरगेंनी राजस्थान व बिहारच्या जवानांचा अपमान केला. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांचा सामना करताना प्राण गमावलेल्या या दोन्ही राज्यांतील जवानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून परत आले. कदाचित, याचा खरगेंना विसर पडला असावा, असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेसचे नेते अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला आले नाही. प्रभू श्रीराम यांचे मंदिर सरकारी नव्हे तर जनतेच्या पैशातून बांधण्यात आले. आता रामनवमी येत आहे. त्यामुळे कोणीही काँग्रेसचे पाप विसरू नये, अशा शब्दांत मोदी बरसले. ‘इंडिया’ आघाडीचे जे नेते राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला हजर झाले.