मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुक सुरु झाली असून राज्यातील राजकीय वातावरण देखील आता तापायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे ५० टक्के अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार होते. शपथविधीनंतर त्यांच्यासोबत येण्यास तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे.
अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार पक्षातून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या भूमिकेने पक्षात दुफळी निर्माण झाली. अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्यानंतर शपथविधीनंतर शरद पवार देखील ५० टक्के सोबत येण्यास तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आम्ही त्यांना भाजपसोबत येण्याची विनंती केली होती. आम्ही अनेक प्रयत्न केले होते. तुम्हीही पाहिलं असेल, पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतरची ही गोष्ट आहे. त्यानंतर मुंबईच्या बैठकीनंतर स्पष्ट दिसत होतं की, आमचं त्यांच्याशी बोलणं सुरु होतं. शरद पवार देखील ५० टक्के भाजपसोबत येण्यास तयार होते’.