ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बच्चू कडू यांचे विधान : म्हणून मी मुख्यमंत्री शिंदेंसोबत !

मुंबई : वृत्तसंस्था

उल्हासनगर सर्वांची इच्छा असलेले दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे सामान्यांचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केले असल्यामुळे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. त्यामुळे आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी उल्हासनगर येथे केले.

उल्हासनगर येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवार, १३ मे रोजी रात्री पार पडला. यावेळी बच्चू कडू यांनी हे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पूर्ण केले असल्यामुळे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले तरी ते सर्वसामान्यांसाठी लढलो म्हणूनच आहेत, गुंडागर्दी केली म्हणून नाही. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात पक्षाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अनेक वेळा उपोषण तसेच आंदोलन करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो, मग बघू सरकार कसे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आमची भूमिका नेहमी स्पष्ट असते. सामान्य माणसाच्या हिताआड कुणी आलेच तर आमचा कोणी बाप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील, उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रधान पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!