मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल येवून गेला आहे. यात राज्यात भाजपच्या महायुतीला फटका तर महाविकास आघाडीला चांगले दिवस आले असून आता आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली असून आता ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलायची सवय सोडून दिली पाहिजे. मागच्या १० वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. मोदी भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात अशी टीका ठाकरे गटाने मुखपत्रातून केली आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागतात असा घणाघात देखील ठाकरे गटाने केला आहे.
”मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे. श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
तसेच ”नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय?) असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल. पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे. राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे. मोदी यांना आता विकासावर बोलावेसे वाटले. मागच्या दहा वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही”, असे ठाकरे गटाने केला आहे.
याशिवाय ”‘मनी लाँडरिंग’ पद्धतीने भाजपने जमा केला व मोदी शहाजोगपणे भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या वल्गना करतात. यास ढोंगच म्हणायला हवे. मोदी यांनी गायी कापणाऱ्या व गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून निधी स्वीकारला व लोकसभेत ते हिंदुत्वावर प्रवचने झोडतात. मोदी यांच्या हिंदुत्वाचा पराभव प्रत्यक्ष अयोध्येतच झाला. कारण सत्यवचनी रामाला भाजपचा खोटारडेपणा मान्य नव्हता. मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.