ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरात विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक, सुरक्षा वाऱ्यावर संबंधित विभागाची डोळेझाक

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट शहरात सध्या काही खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक अनधिकृत वाहनांद्वारे बिनदिक्कतपणे सुरू आहे.त्यामुळे अक्षरशः विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असून या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.यातून एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल आता पालकांमधून विचारला जात आहे. यात या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जात असल्याने विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरला जात आहे. अक्कलकोट शहरात अनेक खाजगी शाळा आहेत.यात इंग्रजी माध्यमांच्या ही शाळा आहेत.काही शाळांनी स्कूल बसची जबाबदारी स्वतःकडे घेतली नाही.काही शाळा स्कूलबसची जबाबदारी खाजगी स्कूल बस वाल्यांकडे दिली आहे.त्याची जबाबदारी संस्था चालक घ्यायला तयार नाहीत.त्याचे दर देखील मनमानी पद्धतीने ते आकार आहेत.

पालकांकडून सक्तीने ते वसूल करत आहेत. विद्यार्थी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. पण बहुतांश ते अनधिकृत स्वरूपात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरटीओकडे या स्कूलबसची नोंदच नाही,अशी माहिती समोर येऊ लागली आहे. शहरात एकूण खाजगी शाळांची संख्या, स्कूल बसने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शाळांची संख्या,शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या, फिटनेस प्रमाणपत्र घेतलेले वाहनधारक, स्कूलबसच्या नावाने नोंद असलेले वाहन, स्कूल बसने वाहतूक होणारे विद्यार्थी याचा डाटा शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे राजरोसपणे विद्यार्थ्यांची अनधिकृत वाहतूक सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यास उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत पण या गंभीर प्रकारातून एखाद्या विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार शिक्षण विभाग, संस्थाचालक की खाजगी स्कूल बस वाहतूक वाले असा प्रश्न आता निर्माण होत आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.याकडे आरटीओ विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा पालकांमधून सुरू आहे.वास्तविक पाहता फिटनेस प्रमाणपत्र न घेता रस्त्यावर वाहन धावणे धोक्याचे आहे. शाळांच्या नावाने नोंद नसलेल्या खाजगी वाहनांची संख्या अधिक आहे.एखाद्या कठीण परिस्थितीत पालकांनी तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न निर्माण होत आहे.खाजगी नोंदणीकृत असलेल्या स्कूलबस मधून नियमाच्या उल्लंघणाबाबत पालकांनी जाब कोणाला विचारावा.एखादी अनपेक्षित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण यासारखे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत.अनेक वाहन चालकांकडे लायसन्स नाहीत,ते बिनधास्त पद्धतीने वाहन चालवतात.त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

याबाबत वाहन चालकांना विचारल्यास आम्हाला याबाबत काही माहिती नाही.स्कूलबसच्या मालकांना याबाबत तुम्ही माहिती विचारा असे उत्तरे दिले जाते.सध्या शहर व तालुक्यात काही शाळांचे विद्यार्थी क्रुझर,ओमिनीसारख्या वाहनांमधून कोंबून नियमबाह्य वाहतूक सुरू आहे.पालक शिक्षणासाठी भरमसाठ फी भरून विद्यार्थ्यांना शाळेला घालतात आणि गरजे पोटी अशा अनधिकृत वाहनांमधून त्यांच्या मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेला जावे लागते ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.याबाबद्दल पालकांमध्येही तीव्र संताप सुरू असून शिक्षण विभागाने व आरटीओ विभागाने संयुक्तिक मोहीम काढून या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

शाळा प्रशासनास जबाबदार धरून कारवाई करू

शाळेशी अधिकृत करार केलेल्या स्कुल बस नियमांचे उल्लंघन करत असतील तर शाळा प्रशासनास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल.शाळांची तपासणी केली जाईल यात जे वाहन अनाधिकृत आणि नियम बाह्य वाहतूक करत आहे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. असा प्रकार शहरात होत असेल तर तो गंभीरच आहे.
– प्रशांत अरबाळे,
गट शिक्षणाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!