मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात महिला व बाल अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. रत्नागिरी येथील घटना देखील आता ताजीच आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात देखील गुंडांनी पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील पुढील दिशा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला शरद पवार, नाना पटोले यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि जागावाटप ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सध्या सुरू आहे. यातच आजही तातडीची बैठक उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बदलापूर येथील घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदच्या हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीला हा बंद मागे घ्यावा लागला होता. असे असले तरी मुक आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याची रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाची देखील चर्चा या बैठकीत होणार आहे.