एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास निर्णायक भूमिका घेऊ
अक्कलकोट येथे सकल धनगर समाज बांधवांचा रस्ता रोको
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर धनगर समाज बांधव निवडणूकीत निर्णायक भुमिका घेईल. यापुढे धनगर समाज बांधवांनी देखील फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराला मते द्यावीत त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असा इशारा सोमवारी अक्कलकोटमध्ये देण्यात आला.सकल धनगर समाजाच्यावतीने सोलापूर रोडवरील डॉ.आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातील व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांच्यावतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी मंत्री सिध्दाराम म्हेञे, सुनील बंडगर,
अविनाश मडिखांबे, रमेश पाटील, आनंद तानवडे,बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानुरे, सुनिल कटारे, मल्लिनाथ पाटील, अशपाक बळोरगी, महेश जानकर, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, अनिल बर्वे, दत्तात्रय हिळ्ळी, सुभाष पुजारी,दत्तात्रय माडकर, सुर्यकांत बाचके, गुणवंत लवटे, महादेव करमल, विठ्ठल खताळ,दाजी कोळेकर यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलनास माजी मंत्री म्हेञे, रिपाईचे तालुका अध्यक्ष मडिखांबे, शिलामणी बनसोडे,आनंद तानवडे,रमेश पाटील,मल्लिनाथ पाटील, तळेवाड ग्रामपंचायत यांच्यावतीने पाठींब्याचे लेखी पञ दिले.यावेळी बोलताना म्हेञे म्हणाले,राज्यात आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट मिटींगमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होतो. पण आजतागायत दहा वर्षे झाले पण आश्वासन का पुर्ण झाले नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. बंडगर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज बांधव निर्णायक भुमिका घेईल.
यापुढे धनगर समाज बांधवांनी फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराला मते देऊन आपलेच उमेदवार निवडून आणावे,असे आवाहन केले. तर रिपाईचे मडिखांबे म्हणाले धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी अनेकवेळा लेखी पाठिंबा दिला आहे.त्यामुळे सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी तानवडे, मोरे, बुक्कानुरे, पाटील, अनिल बर्वे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनामुळे नागरीकांची गैरसोय झाली. जवळपास एक तास चक्का जाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांग लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सुञसंचालन रासप तालुकाध्यक्ष माडकर यांनी केले.