सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आता १० ते १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीत साडेसहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ते पाणी औज बंधाऱ्यात ६ जानेवारीपर्यंत पोचणार असून त्यानंतर धरणातील पाणी सोडणे बंद केले जाणार आहे.
सोलापूर ते उजनी ही समांतर जलवाहिनी अजूनही पूर्ण झालेली नाही. नोव्हेंबरअखेर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, पण विधानसभा निवडणूक व काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आणि इतर काही अडचणींमुळे काम पूर्ण व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर तीन महिने प्रात्यक्षिक चालणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यावरील पाणीपुरवठ्यावर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे.