परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आंबेडकर अनुयायांनी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी परभणी मधून हा लाँग मार्च मुंबईकडे निघणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि आंबेडकर अनुयायांची बैठक देखील झाली. मात्र तरी देखील हा लाँग मार्च काढण्यावर आंबेडकर अनुयायी ठाम आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरी देखील प्रशासनांने पोलिसांवर कारवाई केली नसल्याचा आरोप या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आता वेळ न देता लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचा निर्णय आंबेडकरवादी नेते आणि अनुयायांनी घेतला आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस प्रशासन आणि अनुयायांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. आज दुपारी परभणी येथे धरणे आंदोलन करून त्याच ठिकाणावरुन हा लाँग मार्च मुंबईकडे निघणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिस महाराणी मुळे झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर सरकारच्या वतीने मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी ही मदत नाकारली आहे. जोपर्यंत संबंधित दोष पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.