मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड खून प्रकरण दिवसेदिवस वेगळे वळण घेत असतांना आता देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उज्वल निकम यांची रात्री मुख्यमंत्री यांच्या सागर बंगल्यावर भेट झाली. या दोघांमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. दरम्यान हे प्रकरण उचलून धरणारे भाजप आमदार सुरेश धस आणि देशमुख कुटुंबीयांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता या प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री आणि उज्वल निकम यांच्या या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत माहिती देण्यास उज्वल निकम यांनी नकार दिला आहे. त्यामुळे याबाबतची अधिक माहिती समजू शकली नाही. मात्र, बीड प्रकरणी वकीलपत्र घेण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून निकम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी एसआयटी पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देखील देण्यात आला आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता पाहता सरकार अधिक सावधगिरीने हे सर्व प्रकरण हाताळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची तयारी देखील सरकार करत आहे.