सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव तर महायुतीला मोठे यश आले होते तर आता महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्रीपद देखील घोषित केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर हे 23 जानेवारी रोजी मुख्यनिवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे.
आमदार उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात ज्या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा देखील जानकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता माळशिरसचा मुद्दा थेट दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे. येत्या 23 जानेवारी रोजी दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयोगाकडे आमदार उत्तमराव जानकर हे त्यांचा राजीनामा व त्याच सोबत मारकडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. तसेच याच दिवशी जर मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर नाही केली तर आमदार उत्तमराव जानकर व माजी आमदार बच्चू कडू दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी आणि धानोरे गावातील मतदारांनी ग्रामसभा घेऊन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत. या दोन्ही गावातील मतदारांचे प्रतिज्ञापत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर केले जाणार आहे. त्यात त्यांनी पुन्हा मॉक पोलसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नुकतेच धानोरे येथे मतदारांनी हात वर करून मतदान केले आहे. यात 1206 मतदारांनी हात वर केला होता. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष 963 मते मिळाली होती.
माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर व भाजपचे राम सातपुते यांच्यात सामना रंगला होता व उत्तम जानकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी जानकर यांनी 29 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. तसेच बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची देखील तयारी करण्यात आली होती, मात्र प्रशासनाच्या विरोधामुळे हे मतदान होऊ शकले नव्हते.