मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर महाविकास आघाडी सरकारला यंदाच्या निवणुकीत मोठा फटका बसला आहे. नुकतेच बीड जिह्यातील खून प्रकरण तापले असतांना आता मराठा आरक्षणासाठी ते आजपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसत आहेत.
मराठ्यांनी सरकारला भरभरून मते दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील, मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत. आमच्या मागण्या सरकारला माहीत आहेत. मला समाजाची काळजी असल्याने मी पुन्हा उपोषण करीत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ते आजपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसत आहेत.
ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी 15 महिन्यांत त्यांचे सातव्यांदा उपोषण आहे. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या, गॅझेट लागू करा, शिंदे समितीचे काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, आम्हाला संघर्ष करावा लागेल. समाज मला साथ देतो, समाज मला कधीही उघड्यावर पडू देत नाही. या आमरण उपोषणाला देखील मोठा प्रतिसाद मिळेल, आरक्षण सगळ्यांना हवे आहे. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होईल. खरे जातीयवादी कोण हे आता समजेल, असे जरांगे यांनी सांगितले. शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, व्हॅलिडिटी का देत नाही, हे आता कळेल. आज सकाळी 10 वाजता उपोषण सुरू करणार, ज्यांना उपोषणात बसायचं ते बसतील इतरांनी पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण दबणार नाही कुणाचाही बाप आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. सूर्यवंशी हत्या प्रकरण, देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमचे आंदोलन मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. पण सरकार गोरगरीब मराठा समाजाचा का छळ का करत आहे हे आम्हाला समजले नाही. मी आमच्या मूळ मागणीसह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजातील मागेल त्या व्यक्तीला कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देणे, कुणबी नोंदी शोधणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, EWS आरक्षण पुन्हा लागू करणे या आमच्या मुख्य मागण्या आहेत. या मागण्या मान्य करून मराठा समाजाची मने जिंकण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी संधी आहे.