मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे गट व महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करायला हवी, असेही राणे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते सत्य होते.
शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. जे जुने शिवसैनिक आहेत. त्या प्रत्येकाला नीलम गोऱ्हे जे बोलल्या, ते सत्य असल्याचे माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांची पाठराखण करायलाच हवी. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांची असंख्य बिले ही एकनाथ शिंदे यांनी देखील भरलेली असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, गाडीचे पेट्रोल, खासगी विमानाचे बिल तसेच घरातील एसी देखील त्यांचा नाही. हे सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे कधीतरी त्यांनी खुल्या रंगमंचावर येऊन चर्चा करावी, अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे. हे सर्व आम्ही पुराव्या सगट द्यायला तयार आहोत. नीलम गोऱ्हे या काहीच वाईट बोलल्या नाहीत. मात्र, मातोश्रीच्या वहिनींना ते सत्य असल्यामुळे झोंबले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
कोकण पट्ट्यातच नाही तर महाराष्ट्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नरेंद्र महाराज यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी जेवढी विकासाची कामे केली आहेत, तेवढी कामे शंभर जन्म घेऊन देखील विजय वडेट्टीवार करू शकत नाही. मात्र ते सर्व हिंदू द्वेषी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असते तर त्यांनी असंख्य साधू संतांना जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम देखील महाविकास आघाडीने आखला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याचे नियोजन काँग्रेसने केले होते. मात्र महाराष्ट्रातील हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे महायुतीचा सरकार राज्यात आणले. त्यामुळे त्यांचे सर्व मनसुबे धुळीत मिळाले असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. नरेंद्र महाराज यांच्या बद्दल विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी राणे यांनी केली आहे. याबद्दल त्यांचे नेते का बोलत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.