मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वीची आहे. पण आज हे पीडित कुटुंब न्यायाच्या मागणीसाठी विधानभवनावर आले होते. तिथे त्यांनी आपल्याला जय श्रीराम म्हणण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याचा दावा केला. त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
अशरफ शेख असे पीडित कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे नाव आहे. ते आज आपल्या पत्नी व मुलीसह विधान भवनाबाहेर आले होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही कणकवली येथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथून परत येताना पनवेल येथे मारहाणीची घटना घडली. तिथे 30-35 महाविद्यालयीन तरुण होते. त्यांच्यात मी एकटी हिजाब घालून होते. ते आम्हाला पाहून जय श्रीरामची घोषणाबाजी करत होते. त्यांनी माझ्यावरही जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला. एवढेच नाही तर माझ्यासह माझ्या नवऱ्यालाही मारहाण केली. यासंबंधी आम्ही पनवेलला तक्रारही दाखल केली आहे.
अशरफ शेख या प्रकरणी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले, 25 जानेवारी 2024 रोजी मडगाव एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. आरोपींनी माझ्या 4 वर्षीय मुलीवरही चहा फेकला. मला व माझ्या पत्नीला मारहाण केली. त्याची तक्रार मी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर रेल्वेने पनवेलला मदत मिळेल असे सा्ंगितले. पण तोपर्यंत सर्व आरोपी पळून गेले. त्यानंतर पनवेलची केस कणकवली येथे वर्ग करण्यात आली. कणकवली येथे आम्ही जबाब देण्यास गेलो असता तिथे नीतेश राणे यांच्यापुढे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली. त्यांनी आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांत तालुका अध्यक्ष सोनू सावंत, वरवडे गावचे उपसरपंच अमोल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. आता आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला मारहाण झाल्याच्या घटनेला 1 वर्ष लोटले आहे. पण आरोपींना अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या मंत्री नीतेश राणे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे, असेही अशरफ शेख यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.