अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फटका ज्वारी पिकासह द्राक्ष बागांना बसल्याची चर्चा शेतकऱ्यांतून सुरू आहे. संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रचंड उकाडा जाणवत होता.त्या उकाड्याचा परिणाम म्हणून संध्याकाळी
अर्धा तास कमी अधिक प्रमाणात अनेक गावांमध्ये हा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
जेऊर आणि परिसर, वागदरी आणि परिसर, चुंगी परिसर तसेच अक्कलकोट आणि शहर परिसरात हा पाऊस पडल्याचे वृत्त आहे अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस पडल्याने शेतात पडलेल्या ज्वारी पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वाधिक फटका हातात तोंडाला आलेल्या द्राक्ष बागांना बसला असून यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज जाहीर केला होता परंतु तशा पद्धतीचे वातावरण दिसत नव्हते. गुरुवारी सकाळी मात्र उकाडा प्रचंड जाणवत असल्याने सायंकाळी चार वाजल्यापासून पाऊस येण्याचे संकेत मिळत होते. तापमान देखील ४०° च्या वर होते.त्यानुसार संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.खास करून अबाल- वृद्ध नागरिकांना यामुळे प्रचंड
दिलासा मिळाला आहे.