सोलापुरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशांवर कारवाई करा
आमदार सुभाष देशमुख यांची अधिवेशनात मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी, नई जिंदगी भागात असलेल्या विमानतळाशेजारी तसेचदक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथे बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी करत सभागृहाचे लक्ष वेधले.
दिनांक 5 मार्च रोजी अक्कलकोट एमआयडीसी परिसरात बारा बांगलादेशी नागरिक सापडले. त्या बांगलादेशी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी व कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध घुसखोरी केली आहे. असेच बांगलादेशी या नागरिक एमआयडीसी, नई जिंदगी तसेच दक्षिण तालुक्यातील कणबस भागात राहत आहेत.अनेक नागरिक बोगस मतदान करत आहेत.ते स्थानिकांच्या मदतीने बनावट भारतीय आधार कार्ड बनवून सोबत बाळगत असल्याने भारतीय नागरिकांना परदेशी नागरिकांपासून धोका निर्माण झाला आहे, त्यासाठी राज्य शासनाने तात्काळ याची दखल घेऊन राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिवेशनात केली.