अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहराच्या काही भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार नव्या डीपीची मागणी करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याने
या भागातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी म्हणजे २४ मार्च रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या पाठोपाठ धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलनकर्तेच्या बैठकीत घेण्यात आला.यासंदर्भांतील निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
यांचे कार्यालय व संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती बळोरगी यांनी दिली.
अक्कलकोट येथील जनता चाळ, लोखंडे गल्ली, माणिक पेठ, सलगर रोड, इदगाह परिसर या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून अत्यंत कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असून याबाबत अनेक वेळा संबंधीत अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी अनेकवेळा निवेदन व तक्रारी देण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या आगोदर जिल्हाधिकारी यांच्या दालनात खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकी दरम्यान कार्यकारी अभियंता राठोड यांनी जिल्हा अधिकारी व खासदार प्रणिती शिंदे यांच्या त्यांनी समक्ष एका महिन्यामध्ये सदरचे काम पूर्ण करून घेतो असे मान्य केले होते. परंतु अद्याप काहीच काम केले नाही.सध्या उष्णतेचे प्रमाण वाढत असून वाढत्या उष्माघातामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरच्या भागामध्ये अत्यंत गोर गरीब, दिन दलित मागासवर्गीय लोक राहत आहेत. त्यामुळेच यदाकदाचित या भागात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे, असे आमचे मत बनले आहे.या संदर्भात १७ डिसेंबर रोजी देखील लेखी निवेदन उपअभियंता आडम यांना दिले होते. परंतु संबंधीत उपअभियंता यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. सदर बाब अत्यंत गांभीर्याची असून सदरचे काम जनतेच्या हितासाठी असून त्वरीत काम करण्यात यावे अन्यथा आंदोलन तीव्र पद्धतीचे करण्यात येईल,असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.मोर्चा व धरणे आंदोलन एमएसईबी कार्यालयाच्यासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.