ध्यास विश्वसार्ह बातमीचा

त्यामुळे आमच्यातली युती तुटली ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात पुन्हा एकदा शिवसेना – भाजप युती कशी तुटली? यावर टीका टिप्पणी सुरु झाली आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – भाजप युती कशी तुटली? याविषयी मोठे विधान केले आहे. तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी आधीच 151 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा पक्ष 151 जागांवर अडून बसला होता. आम्ही त्यांच्याकडे 147 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र कौरवांप्रमाणे ते पाच गावे देखील देण्यास तयार नव्हते. त्यामुळे आमच्यातली युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “… जेव्हा युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा त्यावेळच्या शिवसेनेने मनाशी ठरवले होते की त्यांना फक्त 151 जागा लढवायच्या आहेत. आमचा प्रस्ताव असा होता की आम्ही 127 जागांवर निवडणूक लढवू आणि शिवसेना 147 जागांवर निवडणूक लढवेल. तर उर्वरित जागा आम्ही आमच्या युतीमधील छोट्या पक्षाच्या भागीदारांना देणार होतो. या कारणास्तव, आम्ही त्यांना खूप समजावून सांगितले की, आम्ही 127 जागांवर निवडणूक लढवू आणि तुम्ही 147 जागांवर निवडणूक लढवा. तुमचाच मुख्यमंत्री असेल आणि आमचा उपमुख्यमंत्री असेल. मात्र, तोडगा काढण्यास ते तयार नव्हते”

या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, 2014 साली शिवसेना-भाजपची युती तुटू नये असे देवेंद्र फडणवीस यांचे मत होते. तेव्हा युतीसंदर्भात ते सकारात्मक होते. पण वरीष्ठांकडून जो कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 2014 ते 2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे. असे असेल तर त्यांनी 2019 बद्दलही बोलले पाहिजे. 2014 ला भाजपचे वरीष्ठ नेते शिवसेनेसोबत युती तोडायची हे ठरवून दिल्लीतून मुंबईत आले होते. चर्चेचे फक्त गुऱ्हाळ सुरू होते. मा. बाळासाहेब ठाकरे नाहीत यांचा फायदा घेत त्यांना शिवसेना संपवण्याचे त्यांचे धोरण होते. हिंदुत्ववादी आहे असे दाखवत असले तरी शिवसेना संपवण्याचे फरमान घेऊन त्यांचे नेते दिल्लीतून महाराष्ट्रात आले. त्यांना पोस्टर लावायला जेव्हा माणसं भेटत नव्हती तेव्हा आम्ही त्यांना गावोगावी हिंदुत्ववादी म्हणून फिरवले. पारल्याच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपला सतजले की महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत असतील तरच आपण देशभरात हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो. म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. मतांची विभागणी नको म्हणून बाळासाहेबांनी एकत्र काम करू असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!