ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.धस यांनी मुंडेंना वाचवले ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. सुरेश धस यांनीच धनंजय मुंडे यांना वाचवले. मात्र आता त्यांच्या विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.

याविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सत्य कितीही झाकले जात नाही. त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केला तर नियतीला ते मान्य नसतं. त्या लोकांनी जे काही केले ते सर्व कोणासाठी केले तर धनंजय मुंडे यांच्या साठीच केले, असे म्हणत त्यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर देखील निशाणा साधला. धनंजय मुंडे यांचीच ही संघटित गुन्हेगारी असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्या ठिकाणी खंडणी वसूल करायची आणि हा पैसा धनंजय मुंडे यांना दिला जायचा. त्यामुळे आता या प्रकरणातील नंबर एकचा आरोपी हा टोळी तयार करून अशी कृती करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

या प्रकरणात एक नंबरच्या आरोपीने खंडणीसाठी खुन करायला लावण्याचे सिद्ध झाले आहे. असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच मोर्चे काढायला लावले. रस्ता रोको आंदोलन करायला लावले. तसेच माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडे यांनीच जोडे मारायला लावले. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नियतीला ते मान्य नसतं. तुम्हाला याचे फळ मिळेल. माझ्या नादी लागू नका, इथून पुढे माझ्या नादी लागल्यास मी सोडणार नाही, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

संतोष देशमुख यांचा खून केला हे सत्य आहे. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच हा खून झाला असल्याचा देखील आरोप मनोज मनोज पाटील यांनी केला आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडे यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते आता शक्य होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक ना एक दिवस बदलणार आणि संतोष भैया देशमुख यांचा खून खटल्याचा योग्य तपास होईल, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!