बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. एक घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते. अशीच एक खुनाची घटना घडली. ज्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. राष्ट्रीय महामार्ग -६१ वरील माजलगाव पाथरी मार्गावर असलेल्या माजलगाव शहरापासून ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्रवरील ढाब्यावर खून झाला आहे.
२० एप्रिल रोजीच्या संध्याकाळी ७.३० ढाब्यावर ढाबामालक महादेव गायकवाड (५४ वर्षे, रा. मंजरथ, रोड माजलगाव) यांच्यावर माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बिलावरुन झालेल्या वादातून हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आली. या हल्ल्यात ढाबा मालकाचा मुलगा (२२ वर्षे) याच्यावरदेखील हल्ला केल्याची माहिती समजली आहे.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत महादेव गायकवाड यांना माजलगाव शहरातील डॉ. गिलबिले यांच्या बायपास रोडवरील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासाने संजीवनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले यांनी शेवटच्या टप्प्यात सल्ला दिला की, महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविले गरजेचे आहे. त्यानंतर महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे हलवले. पण उपचारादरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा आशुतोष महादेव गायकवाड यांचे सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.