अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती. पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले.
नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज दिवसभरात आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे, अक्कलकोटचे न्यायाधीश मुकूल कल्याणकर आदींनी दर्शन घेतले. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ५० भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे,व्यंकटेश पुजारी, गणेश दिवाणजी, शिवशरण अचलेर, श्रीपाद दिवाणजी, सुहास पाटील, दर्शन घाटगे, दिपक गवळी, महेश मस्कले, नागनाथ गुंजले, शिवशरण इचगे, प्रशांत गुरव, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, मंगेश फुटाणे, श्रीमुख जगदाळे, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, संतोष देगावकर, स्वामीनाथ लोणारी, मल्लिनाथ बोधले, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी बाळासाहेब घाटगे, सागर गोंडाळ, दीपक जरीपटके, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, संजय बडवे, ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद किलजे यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.
भाविकांनी मिळाला दिलासा
यंदाच्या नियोजनामध्ये नगरपरिषदेने आणि महसूल विभागाने लक्ष घातले होते. त्याला देवस्थान समितीनेही सकारात्मक प्रतिसाद भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला होता. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असल्याने भाविकांना काही
अंशी दिलासा मिळाला.