---Advertisement---

मंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार ; तुमच्या नेत्यांसारखे ते लंडनला गेले नाहीत !

By team
On: April 28, 2025 5:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्यानंतर विरोधक जोरदार टीका करीत असतांना आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विरोधकावर पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या दरे या गावी गेले होते. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबासोबत लंडनला गेले आहेत. दरेवारी आणि लंडनवारीची सध्या तुलना केली जात आहे. यावरून राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात त्यांच्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाहीत, असा टोला सामंत यांनी लगावला आहे.

विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या गावाला जाण्यावरून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या नेहमीच टार्गेटवर असतात. त्यांनी काहीही चांगले केले तरी ठाकरे सेनेच्या लोकांना ते पचत नाही. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी ते पहलगामला धावून गेले त्यावरही टीका केली, त्यानंतर शेती पाहण्यासाठी आपल्या दरे गावात गेले तेही त्यांना रुचले नाही. शिंदे हे आपल्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाहीत.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले होते. अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वात महायुतीने विधानसभेची निवडणूक लढली. पुन्हा महायुतीचे सरकार आले. शिवसेना आणि सेनेचा धनुष्यबाणही त्यांनाच मिळाला. त्यामुळे उद्धव सेनेच्या नेत्यांना ते चांगलेत खटकत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात.

दरे गाव महाराष्ट्रातच आहे. एकनाथ शिंदे यांची तिथे शेती आहे. ते यावेळी पहिल्यांदाच गेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाही ते जात होते. ते काही पिकनिकला लंडनला जात नाही. कोणी कुठे जायचे यावर आम्ही कधी बोलत नाही. त्यांच्या घरातील सगळी मंडळी लंडनला गेली, तरीही आम्ही टीका करत नाही. हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे. शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमचे काही बिघडणार नाही. मात्र शिंदे यांच्यामुळे अनेकांचे अस्तित्व संपले, त्यामुळे ते सतत टीका करत असतात, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत म्हणाले, काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक बळी पडले. शेकडो पर्यंटक अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी शिंदे तत्काळ पहलगामला गेले. पर्यटकांना धीर दिला. त्यांनी सोडवणूक केली. अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणले. यात काय वाईट आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांचे आभार मानत आहे. फक्त उद्धव सेनेच्याच नेत्यांना ते खटकत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!