सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. यावर काँग्रेस नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमकपणे बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करत आहे. पण काँग्रेस कमकुवत होणार नाही. उलट महायुतीच ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ अशी स्थिती झाली आहे. पहलगामला अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले. त्यांनी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला प्रचारसभा घ्यायला गेले. इंदिरा गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला, मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत?,” असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला.
“संविधानाला सर्वात जास्त धोका भाजपकडून आहे. तुमच्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन झाली असल्याचे बोलतात. त्यांच्या मनात बाबासाहेब आणि संविधानाबाबत तिरस्कार आहे. 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी होता. हे प्रत्येक बाजूने उघडं पडल्यावर आता भाजप संविधान-संविधान म्हणत आहे,” असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी संविधान सद्भावना यात्रेच्या समारोप प्रसंगी लगावला.
“सरकार 300 वर्षांपूर्वीच्या गोष्टी उकरून काढतात आणि दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करतात. जसं राक्षसाला रक्त लागतं, तसं भाजपला दंगली लागतात. जेव्हा भाजपला दुसरा काही अजेंडा मिळत नाही तेव्हा ते पेटवण्याचे काम करतात. पण माझ्या देशाचा डीएनए हा सर्वधर्मसमभावाचा आहे. या देशात दंगलीचं, जातीवादाचं विष हे सरकार पेरण्याचं काम करत आहे. त्यामुळे आपण गप्प बसू शकत नाही, नाही तर तो संविधानाचा अपमान असेल,” असेही त्यांनी सांगितले.