ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ‘त्या’ परिवारांनी मानले मोदींचे आभार !

मुंबई : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच ‘धन्यवाद मोदी’जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद पर्यटकांच्या विधवा आणि नातेवाइकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे. या सर्वांच्या मनामध्ये आम्हाला न्याय मिळाल्याची भावना असल्याचे दिसून आले.

भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय महिलांचे कुंकू पूसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला आहे. या घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांच्या हत्येचा बदला एका अर्थाने भारतीय सैनिकांनी घेतला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील देखील सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांनी बदला पूर्ण झाला असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहे. पाकिस्तानला धडा शिकवा आणि दहशतवाद दूर करा, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली होती.

या हल्ल्यात पती गमावलेल्या संगीता एकबोटे यांनी या ऑपरेशन बद्दल भारतीय सैनिकांचे आभार मानले आहेत. या ऑपरेशनला सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा सन्मान राखला असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. या हल्ल्याला आता पंधरा दिवस झाले आहेत. मात्र अद्याप एकही दिवस असा गेला नाही की, मला त्यांची आठवण आली नाही. आजही तो दिवस आठवून आम्हाला अश्रू अनावर होतात. अशी प्रतिक्रिया संगीता एकबोटे यांनी दिली आहे.

ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले आहे. माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला आहे, याचे मला समाधान वाटत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. मी त्यांना काहीही सांगायला खूप लहान आहे. मात्र, आमच्या कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!