मुंबई : वृत्तसंस्था
भारताने पाकविरोधात केलेली कारवाई ही केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना केले आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी अतिरेकी हल्ला केला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटकांचा बळी गेला. या घटनेमुळे संपूर्ण देशात पाकविरोधात संतप्त सूर उमटले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला धडा शिकवला. भारताच्या कारवाईत पाकचे 100 हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त विधान केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पाक अतिरेक्यांनी 28 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या त्या नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारले. घरात घुसून मारले. आता त्यांनी पाकवर कठोर निर्बंध लादलेत. त्यांनी आता पाकला ठणकावून सांगितले आहे की, भारतात एक जरी नक्षलवादी कारवाई झाली, तरी त्याला युद्ध समजले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत किती बलशाली आहे तो काय करू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. हा फक्त ट्रेलर होता. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यानंतर या देशाशी कुणी बदमाशी करेल, बेईमानी करेल, छेडण्याचा प्रयत्न झाला तर हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे सैन्य बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
खरे तर मोदींनी ज्या पद्धतीने देशाला वाचवण्यासाठी देशाच्या नागरिकांना वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली ती अतिशय महत्त्वाची आहे. मोदींच्या कालच्या संबोधनानंतर त्यांना देशातील 140 कोटी जनतेचे पाठबळ त्यांना मिळाले आहे. त्याविषयी त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली, असेही ते यावेळी म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्राला उद्देशातून केलेल्या भाषणात भारत पाकच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नसल्याचे ठणकावून सांगितले. पाकने अण्वस्त्र हल्ल्याच्या दिलेल्या धमक्यांना व त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नांना भारत भीक घालत नाही. भारताने पाक विरोधातील ऑपरेशन सिंदूर तूर्त स्थगित केली आहे. आता पाकिस्तान कसा वागतो, यावर भविष्यात पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत असा निर्णय घेईल याची दहशतवाद्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जेव्हा एखादा देश एकजुटीने उभा राहतो, देशाला प्रथम प्राधान्य या भावनेने प्रेरित होतो, तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. त्यातून अतिशय उत्तम फलित मिळते. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले, तेव्हा तेथील फक्त इमारतीच नव्हे तर त्यांच्या शस्त्रास्त्रांचा साठाही नष्ट झाला. भारतीय क्षेपणास्त्रे, ड्रोन जेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत होते, तेव्हा ते केवळ तळच नव्हे तर दहशतवाद्यांचा आत्मविश्वासही नष्ट करत होते, असेही मोदी आपल्या संबोधनात म्हणाले होते.