अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती पर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम घंटे,डॉ.सारंग पाटील,श्रीधर नडीमेटला यांच्यासह आरोग्य निरीक्षक परमेश्वर बिराजदार,आरोग्य सहायिका सुरेखा वाघमोडे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नेहा अग्रवाल, प्रदीप सुपेकर,सुरेखा कांबळे, गीता पडवळ,सिद्धेश्वर चटमुटगे,विजय कोरे,शुभम गोप, रोहित कांबळे आदींची उपस्थिती होती.
यात रॅली काढण्यात आली.प्रतिज्ञा घेण्यात आली.सीपीआर बाबत प्रशिक्षण देण्यात आले व हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, किटकजन्य रोगाबाबत आरोग्य शिक्षण, माहिती देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे,हिवताप पर्यवेक्षक सुरेश भास्कर, आरोग्य सहाय्यक सिद्रामप्पा लोकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अचानक थंडी वाजून ताप, डोकेदुखी, अंगदुखी, हाड आणि सांध्यांमध्ये वेदना, मळमळ, अंगावर सूज, तापासोबत रक्तस्त्राव होण्याचा धोका, शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरडयांमधून रक्तस्त्राव उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं, अशक्तपणा असे लक्षणे दिसून आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.डेंग्यू पसरवणाऱ्या अळया किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास हे साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात.घरात एसी, फ्रीजखाली, फुलदाण्या कूलर, कुंडया, बादल्या,जुने टायर, यांच्यात पाणी जमा होऊ देऊ नका.घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळा. खिडक्यांना जाळी लावा, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवा. घरातील बॅरल, टाक्या भांडी हवाबंद झाकनाने किंवा कापडाने झाकून ठेवावी. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा,असे आवाहन डॉ.माळी यांनी केले.