सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास लागलेल्या यात आगीत तिघे जण गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर काही जण या आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचे काम केले जायचे. टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली. मध्यरात्री लागलेल्या आगीनंतर टॉवेल कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला.
या टेक्स्टाईल मिलचे मालक स्मानभाई मन्सूरी (वय 78) आपल्या कुटुंबीयांसह कारखान्याच्या परिसरातच वास्तव्याल होते. कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे अद्यापही कारखान्यात अडकलेले आहेत. उस्मानभाई मन्सूरी (वय 78), अनस मन्सूरी (वय 24), शिफा मन्सूरी (वय 23), चिमुकला युसूफ मन्सूरी (वय 1) हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत. मन्सूरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशीरा आल्याचा आरोप केला.
कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आत जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाने तीन लोकांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जेसीबी आणि अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडण्यात आला. अद्याप आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.






