मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 53 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुण्यातही एका रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रण अलर्ट मोडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यात करोना वाढला तरी घाबरण्याचे काम नाही. राज्य सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. राज्यात वाढत्या करोना केसेसवर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे कारण नाही. सगळ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरु आहे. राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे. केईएम रुग्णालयातील ज्या दोन रुग्णांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला, तो कोरोनामुळे झालेला नाही. या दोन्ही रुग्णांना को-मॉर्बिडिटी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. सरकार पूर्णपणे अलर्टवर आहे. लोकांनी कुठेही घाबरु नये,” असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या 56 कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयाने अलीकडेच दोन मृत्यूची नोंद केली असून एक 59 वर्षीय कर्करोग रुग्ण आणि एक 14 वर्षीय मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. दोन्ही रुग्णांचा मृत्यू अंतर्निहित आजाराने झाला असला तरी, त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.