मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या, तुर्कीच्या सेलेबी नास या कंपनीसोबतचा करार रद्द केल्यामुळे कंपनीतील ३,७०० कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, भूमिपुत्रांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही, कामगारांचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला, तर राजकारणात त्याचे तुकडे करण्याचा ठराव करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ कंपनीसह तुर्कीच्या इतर कंपन्यांवर भारतात बंदी घालण्यात आली. ‘सेलेबी नास’ कंपनीतील कामगारांना बेरोजगार होऊ देणार नाही, अशी घोषणा राज्य सरकारने केली.
मात्र, कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले नव्हते. अखेर भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेत इंडो थाई कंपनीत या कामगारांना सामावून घेतले. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेतील सदस्यांनी आणि कामगारांनी मातोश्री येथे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी या सर्व कामगारांना दिलासा देत कामगारांसोबत सदैव उभे राहू, असे आश्वासित केले.
हा तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीचा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या जादुई नावाने झालेला पराक्रम आहे. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देणे किंवा अन्याय होत असल्यास त्याला तोडून मोडून टाकणे, यासाठी झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्या आकाशात घारी असतात, तशी गिधाडेही आहेत. मला आपल्यासोबत असलेल्या कामगारांचे या गिधाडांसापासून रक्षण करण्याची नेहमी चिंता असते. कारण, एकदा का एकजूट तुटली की लचके तोडायला आपले सगळे शत्रू मोकळे असतात, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.