मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान निवडणुका सुरू होण्याआधी किंवा चर्चा, जागावाटप यांच्या चर्चा होण्याआधी जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी पक्षातील नेत्यांना कानमंत्र दिला आहे. जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मित्र पक्षातील संबध ताणले जातील, एकमेकांवरती कुरघोडी टाळण्यासाठी शिंदेकडून उत्तराला प्रतिउत्तर देताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील, त्यावर इतर नेत्यांनी भाष्य करू नये अशी सूचना माजी नगरसेवकांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी राहणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईतील विविध विभागांच्या नियोजनासोबतच मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरिकांचे मेळावे घेऊन एक संघठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणीही मित्रपक्षांबद्दल, जागावाटपाबाबत किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे टाळण्याबाबत शिंदेंनी सूचना दिल्या आहेत.