---Advertisement---

राज्याच्या कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान !

By team
On: May 30, 2025 3:00 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर पंचनाम्यांची मागणी होत आहे. मात्र, कोकाटे यांनी दिलेलं “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान केले असून, यामध्ये कांद्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून कापणी झालेल्या पिकांचाही पंचनामा करावा, अशी मागणी होत असताना कोकाटे यांनी “हार्वेस्टिंग झालेलं आहे तिथे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असा थेट सवाल केला. त्यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय आपत्ती निधीच्या नियमानुसार फक्त उभ्या पिकांनाच मदत मिळते, घरात किंवा चाळीत ठेवलेल्या कांद्याला नाही.

शेतकऱ्यांना कांदा वाचवण्यासाठी साठवलेला कांदा पुन्हा बाहेर काढून निवडावा लागतो, जो खर्चिक आणि कष्टसाध्य प्रकार आहे. वाढलेल्या मजुरी दरांमुळे साठवणुकीचा खर्चही गगनाला भिडत आहे.

कोकाटे यांच्या वक्तव्यावर समाजमाध्यमांतून आणि शेतकरी संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या स्पष्टपणाचं कौतुक केलं, तर काहींनी “ढेकळांचे पंचनामे” हे विधान शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे असल्याचं म्हटलं आहे. पावसामुळे होणाऱ्या नुकसानात भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना, नियमांच्या चौकटीत अडकलेली शासकीय मदत आणि त्यावर कोकाटेंचं बिनधास्त मत या दोहोंमुळे राज्यात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!