‘त्या’ पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या आरक्षणानुसारच
तहसीलदार मगर यांचे स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत अखेर संभ्रम दूर झाला आहे. २०२० ते २०२५ दरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्याने घोषित करण्यात आलेल्या आरक्षणानुसारच घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार विनायक मगर यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. काही ग्रामपंचायतींनी आपली मुदत संपूनही निवडणुका न झाल्यामुळे जुन्या आरक्षणानुसार निवडणुका होणार की नव्या, यावर अनिश्चितता होती. मात्र तहसीलदारांच्या ठाम आणि स्पष्ट भूमिकेमुळे आता हा मुद्दा पूर्णतः निकाली निघाला आहे.या पाच ग्रामपंचायतींमध्ये वसंतराव नाईक नगर, गांधीनगर, कल्लप्पावाडी, समर्थनगर आणि सातनदुधनी या गावांचा समावेश असून त्यांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक नगर – अनुसूचित जाती,गांधीनगर – अनुसूचित जाती महिला,कल्लप्पावाडी – अनुसूचित जमाती महिला,समर्थनगर – सर्वसाधारण,सातनदुधनी – सर्वसाधारण महिला या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवारांची निवड, निवडणूक प्रक्रिया व इतर बाबी नव्याच आरक्षणाच्या अधीन असणार आहेत.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नव्या आरक्षण संरचनेनुसार तयारी करावी लागणार आहे.आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या पाच गावांसह इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा राजकीय रंग आणखी गडद होण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळाली
असून ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनिक सुसूत्रता अबाधित राहणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.