ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदेंच्या शिवसेनेतील सर्वच मंत्री दादांवर नाराज !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना ठाकरेंच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचे कारण देवून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपला साथ देवून महायुतिचे सरकार स्थापन केले मात्र आता पुन्हा एकदा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याशी ‘वन टू वन’ चर्चा करत त्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. या संवादादरम्यान अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांमध्ये अजित पवारांबाबत नाराजीचा सूर असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात शिवसेना मंत्र्यांसोबत स्वतंत्र आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक खात्याची सविस्तर माहिती घेतली. खात्याचे काम किती झाले आहे, किती बाकी आहे, निधीची अडचण आहे का, भविष्यात कोणती महत्त्वाची कामे हाती घेणार आहात, या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. शिंदे यांनी मंत्र्यांना लोकोपयोगी कामांवर भर देण्याचा, फाइल्स प्रलंबित न ठेवण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला.

या बैठकीत अजित पवार यांच्याबाबत तीव्र नाराजीचा सूर उमटला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंच्या समोर तक्रार करताना स्पष्टपणे म्हटले की, अजित पवार आमच्या विकास कामांवर अडथळे आणत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या चर्चेत शिवसेना गटाच्या अंतर्गत नाराजीचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून आले आहे.

अजित पवार अर्थमंत्री आहेत, जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसे करणार? असा प्रश्न यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवा, असे म्हणत सर्वांनी एकमताने अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि मार्ग काढेल, असा शब्द एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा 746 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका केली होती. समाजकल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील 746 कोटींचा निधी लाडकी बहीण योजेनसाठी वळवण्यात आला. ही कृती बेकायदा व अन्यायपूर्ण आहे. या खात्याचा निधीच वळता करायचा असेल तर कशाला शिष्यवृत्ती द्यायची? कशाला वसतिगृहे चालवायची? असा संतप्त सवाल त्यांनी यासंबंधी केला होता.

यापूर्वीही माझ्या खात्यातून 7 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. याची मला कल्पनाही नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर किंवा त्या खात्यात निधीच द्यायचा नसेल तर हे खाते बंद केले तरी चालेल. असा निधी वळवणे हे नियमबाह्य आहे. पण अर्थखात्याला जे वाटते तेच खरे असते. सध्या त्यांची मनमानी सुरू आहे, असेही ते आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!