सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही प्रमाणात पाणी पळवले, असे थेट उत्तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की अजितदादांनी पाणी पळवले का? यावर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, काही प्रमाणात पाणी नेलेले आहे. अजितदादांनी नेले आहे, परंतु आज ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे कार्यकर्ते ते मुख्यमंत्री व्हावेत, असे म्हणतात. मग त्यांनी सर्वांना व्यवस्थित वाटा मिळवा, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही मोहिते पाटलांनी दिला आहे.
पाण्याच्या मुद्द्यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आमच्या हक्काचे पाणी काही प्रमाणात अजितदादांनी नेलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत. कुणाच्याही हिश्श्याचे पाणी काढून न घेता आणखी कसे देता येईल यावर नियोजन करावे. अजित पवारांनी बारामतीला जास्तीचे पाणी नेले, असा मुद्दा 2019 मध्ये होता. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर या मुद्द्यावर गप्प बसलेत. आता गप्प का बसलेत? त्यांचे वाटप योग्य पद्धतीने झाले पाहिजे. सर्व नेत्यांनी एकत्रित बसून कोणावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्षांतर्गत वाद असल्याचे बोलले जाते. यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, विजयदादा आणि अजितदादांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिलेला आहे, असे मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काही लोकांनी करून घेतला. त्याचे उत्तर जिल्ह्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेले आहे. जिल्ह्याचे काय नुकसान झाले हे जिल्ह्याने पाहिलेले आहे. जनतेने लोकसभेलाही सडेतोड उत्तर दिले आहे.
अजितदादांची आणि तुमची कधी भेट झाली आहे का? असा प्रश्न विचारला असता मोहिते पाटील म्हणाले, अजितदादा आणि माझी पुण्यात एका लग्नात गाठ पडली होती. त्याच्यापलीकडे भेट कधी झाली नाही. माझे कधी त्यांच्याकडे काम पडले नाही. पण वेळ पडली तर नक्की जाईल. कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा नाही. दुरावा असण्याचे काही कारणही नाही.