ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय : तब्बल दहा दिवस मांस विक्रीवर बंदी !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. लाखो भाविक, वारकरी आणि पर्यटक आषाढी एकादशीनिमित्त शहरात दाखल होतात. त्यामुळे शहरातील वातावरण आध्यात्मिक आणि भक्तिमय ठेवण्यासाठी हा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे.

या निर्णयानुसार, आषाढी एकादशीपूर्वी सात दिवस आणि नंतर तीन दिवस, म्हणजे एकूण दहा दिवस मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यापूर्वी यात्रा काळात फक्त तीन दिवस मांस विक्रीवर बंदी असायची, मात्र यंदा ती अधिक वाढवून दहा दिवस करण्यात आली आहे. शहरातील आणि पालखी मार्गावरील वातावरण आध्यात्मिक आणि पवित्र ठेवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे वारकरी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, भविष्यात पंढरपूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील मांस विक्रीचे दुकाने कायमचे बंद करून ठराविक ठिकाणीच मांस विक्रीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

पालखी सोहळा ज्या ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस मद्य आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी आणि व्हीआयपी वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशा तीन मागण्या भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. त्या तत्काळ मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रशासनाने आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशानंतर आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!