मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २४ जून रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी वाटपात सापत्न वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे शिवसेनेतील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा होत आहे. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना समोरे जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपवावा म्हणून शिवसेनेच्या एका मंत्र्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला असून ते आपल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत, असे बोलले जात आहे.
मंत्रालयातील बैठकनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मंत्र्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घडून आल्याचे बघायला मिळाले. तर निधी वाटपाबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंतावर असणार आहे. यामुळे महायुतीतील समन्वय राखन्यास कशी मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर होणार असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे मतदारांसमोर जाताना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरिता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उदय सामंत हे शिवसेनेतील वजन असलेले मंत्री आहेत. याशिवाय राष्ट्रवादीत त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे निधीवाटपात सूसूत्रता यावी याकिरता तसेच अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत आगामी काळात काम करताना दिसणार आहेत.