मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला कडाडून विरोध दर्शवला आहे. आपण कोणत्याही स्थितीत हा मोर्चा निघू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी हिंदीच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चात ठाकरे गटानेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज व उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला कडाडून विरोध दर्शवला आहे. मी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा मोर्चा निघू देणार नाही. हा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळा आहे. जे नियम सर्वसामान्य नागरिकांना आहेत, तेच नियम यांनाही लागू असले पाहिजेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकीतच राज ठाकरे यांची भेट घेतली. मला या भेटीवर भाष्य करायचे नाही. पण राज व उद्धव ठाकरे खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. ठाकरेंचा मोर्चा अन्यायकारी आहे. कोर्टाच्या निर्देशांनुसार त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्यांचा मोर्चा बेकायदेशीर आहे. हा बाळगोपाळांचा मोर्चा आहे.
राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांची स्थिती हसण्यासारखी झाली आहे. ते भाषा व सांप्रदायिकतेच्या नावाने वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या मोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. ते हा मोर्चा गल्लीतील निवडणुकीसाठी काढत आहेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.