ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हवामान विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्याला ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात पावसाचा पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असून काही सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण ताकदीने सक्रीय झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगडमध्ये आज संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या भागांत जोरदार पावसाने कहर केला असून, काही भागांत घरांत पाणी शिरले असून, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, एनडीआरएफचे पथक सज्ज करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार तात्पुरत्या सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे दिले आहेत.

हवामान खात्याने येत्या 48 ते 72 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा दिला असून, नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरण व्यवस्थापन आणि जलस्रोत विभाग यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाल्यांपासून दूर रहावे आणि अधिकृत इशारे आणि सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या या अचानक वाढलेल्या पावसामुळे पिकांचे, घरांचे आणि दळणवळणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!