नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत आहे. गेल्या महिनाभरात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई परिसरातील चार व्यापाऱ्यांना मराठी का बोलत नाही? असे म्हणत बदडले. राज यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदरच्या सभेत म्हटले होते की, मराठी शिका. मस्ती दाखवली तर दणका बसणार. त्यामुळे धास्तावलेल्या हिंदी भाषिक व्यापाऱ्यांतर्फे वकील घनश्याम उपाध्यायांनी याचिका दाखल केली.
1 राज यांनी आपल्या भाषणाद्वारे हिंदी भाषिक लोकांविरोधात हिंसाचार भडकावण्याचा व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव वाढत आहे. 2 हिंदीला विरोध म्हणून मराठी न बोलणाऱ्या किंवा इतर राज्यांमधून आलेल्यांवर मराठी लादण्यात येत आहे. 3 तणाव, हिंसाचार, द्वेषासाठी जबाबदार धरून राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत.
महाराष्ट्रातील ३ वकिलांनी नुकतीच पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, राज यांची काही विधाने सामाजिक सलोखा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी आहेत म्हणून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
राज ठाकरे : मुंबई आ जाओ तू आम्हाला पटक पटक के मारणार? मी दुबेला सांगतो. तुम मुंबई आ जाओ. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे.
भाजप खासदार व गायक-अभिनेते मनोज तिवारी म्हणाले की ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल तो महाराष्ट्रात समाप्त होईल. महाराष्ट्रात भाषिक एकतेचा भाईचारा मोडण्याचा प्रयत्न करणारा हा (राज) एक ‘प्राणी’ आहे.
दुबेंनी मुंबई गुजरातचा भाग होती, अशीही गरळ ओकली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्या ३१-३२ टक्के एवढीच आहे. तेवढेच हिंदी भाषिक आणि २% भोजपुरी, १२ टक्के गुजरातीही राहतात. दुबे : माझ्यामुळे हिंदीत बोलले मी अखेर राज ठाकरेंना हिंदी शिकवलीच. माझ्यामुळे राज हिंदीत बोललेत. मुंबई मनपा निवडणूक आली की िहंदी भाषिकांना मारले जाते.