---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश अन सूरज चव्हाण यांचा राजीनामा

By team
On: July 21, 2025 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. लातूरमध्ये ही घटना घडली होती. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ छावा संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी लातूर बंदची हाक दिली आहे. तर हिंगोलीत टायर जाळून निषेध करण्यात आला. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत, सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

”काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.” असे अजित पवार यांनी X ‍वर पोस्ट करत म्हटले आहे.

काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी सूरज चव्हाण यांनी लातूरमधील घटनेबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे अथवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो,” असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!