नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरून निर्माण झालेल्या वादळानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. “कोणताही मंत्री बेशिस्त वागत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल,” असे ठाम मत त्यांनी नागपूरमध्ये व्यक्त केले.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त कृत्यांनंतर त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्टपणे सांगितले की, “जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या वर्तनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. सभागृहात वादंग घडवणं, किंवा सभ्यतेच्या सीमा ओलांडणं, हे खपवून घेतलं जाणार नाही.”
कोकाटेंच्या खातेबदलामुळे पुन्हा मंत्रिमंडळ फेरबदल होणार का, यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “कृषी खाते दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र, सध्या मंत्रिमंडळात अन्य कोणताही बदल होणार नाही,” असे ते म्हणाले.
अलीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांची झालेली भेटगाठ चर्चेचा विषय ठरत होती. त्यामुळे त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश होणार का, यासंबंधी तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, यावर मुख्यमंत्री म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी माझी काही वेळा भेट घेतली, पण त्या भेटी पूर्णपणे वेगळ्या विषयांवर होत्या. मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळ रचना ही मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवतो. त्यामुळे अशा अफवांना बळी पडू नये.”