---Advertisement---

ग्राहकांनी घेतला स्मार्ट मीटरचा ‘धक्का’ : दुप्पट वीजबिल आल्याच्या तक्रारी !

By team
On: August 4, 2025 5:26 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात सध्या महावितरणकडून जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविले जात असून यानंतर बिलांच्या रकमेत प्रचंड वाढ झाल्याने ग्राहक धास्तावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील धारगाव परिसरात स्मार्ट मीटर बसविल्यापासून वीज बिलात दोन ते तीन पटीने वाढ झाली असून या अवाढव्य बीज बिलाने ग्राहक त्रस्त झाले आहेत.

धारगाव येथे दोन ते तीन महिन्याआधी अनेकांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले. नवीन मीटर लावणे बंधनकारक नसताना सुद्धा बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्यात आले. याचा भुर्दंड गोर गरीब नागरिकांना सोसावा लागत आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराने नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ‘महावितरण’ च्या कर्मचाऱ्यांनी जुने वीजमीटर बदलून नवीन वीजमीटर बसविलेल्या अनेक भागातील रहिवासी अशाच प्रकारे वाढीव बिले आल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यामुळे नवीन वीजमीटरमुळे अचूक वीजबिल येते. या ‘महावितरण’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, जुने मीटर सुरू असून कोणतेही कारण नसताना खाजगी कंत्राटदार मार्फत स्मार्ट मीटर बसविण्यात आले. ज्यांनी मीटर बसवण्यास नकार दिला, त्यांना आता मोफत असून भविष्यात मीटर विकत घ्यावे लागणार अशी बतावणी करून बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्यात आले. तर काही नागरिक घरी नसताना त्यांची परवानगी न घेता मीटर लावण्यात आल्याचे वीज ग्राहक सांगत आहेत. याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत असून मीटर बदलून देण्याची मागणी धारगाव येथील नागरिकांची आहे.

भंडारा जिल्ह्यातील पलाडी येथील विशांत शामकुंवर यांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आले. परंतु त्यांनी विरोध करत लगेच लावलेला मीटर काढून जुनेच मीटर लावून घेतले. त्यांना आधी ९०० रुपया पर्यंत वीज बिल येत होते. तर आता त्यांना चक्क ५० हजार बिल आल्याने त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. या प्रकारावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शामकुंवर यांनी वीज बिल कमी करून देण्याची मागणी केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!