---Advertisement---

..तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील ; मनोज जरांगे पाटलांचा इशारा !

By team
On: August 13, 2025 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यासाठी ते विविध जिल्ह्यांना भेटी देत तेथील मराठा समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी बुधवारी परभणी येथील मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या समाजाला दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मी कुणालाही मॅनेज होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हल्ला करायचा आहे. हे षडयंत्र आहे. मी 27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी सोडेल. त्यानंतर मराठा बांधवांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईत दाखल व्हावे. यंदा माघार नाही. आपण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस काही दिवसापूर्वी गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी ओबीसी मेळाव्याला मार्गदर्शन केले. ओबीसी नेत्यांचे कान भरले. त्यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दंगल भडकवण्याचा डाव आहे. मला त्याची कुणकुण लागली आहे. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण फडणवीस यांनी वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकरणी मोठा त्रास सहन करावा लागेल.

देवेंद्र फडणवीस ओबीसी बांधवांसाठी लढा देण्याची भाषा करत आहेत, मग आमच्या मराठा समाजासाठी कोण लढणार? दलित, मुस्लिम व मराठा समाजाने त्यांना मतदान केले नाही का? त्यांच्या या विधानावरून त्यांचा मराठा द्वेष दिसतो. पत्रकारांनी त्यांना आमच्या मुंबईतील आंदोलनाविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना त्यांनी या प्रकरणी पोलिस काय ते पाहून घेतील असे प्रत्युत्तर दिले. पोलिस बघून घेतील याचा अर्थ काय? फडणवीस म्हणजे पोलिस आणि पोलिस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे. तुम्ही मागच्यासारखे हल्ले घडवून आणणार आहात का? आमच्या एका पोराला धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद केले जाईल, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

तत्पूर्वी, समाज बांधवांशी संवाद साधताना त्यांनी एका कुटुंबाची एक गाडी मुंबईला आली पाहिजे असे ते म्हणाले. मराठा समाजासाठी आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आरक्षण मिळाले तर आपल्या पोराबाळांचे भले होईल. त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट रोजी फक्त तीन दिवसांसाठी सर्वांनी मुंबईला आले पाहिजे. तुम्ही फक्त मला तिथे पोहोचवण्यासाठी मुंबईत या. बाकी आरक्षण कसे मिळवायचे हे मी पाहून घेईन. आतापर्यंत अनेकदा मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. पण मी मॅनेज झालो नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मुंबईला या, असे ते म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!