पुणे : वृत्तसंस्था
भाजपमधील आयाराम संस्कृतीवर अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे, तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गत काही वर्षांत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद गिरी महाराजांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाश कार्यक्रमात बोलताना वरील टीका केली आहे. ते म्हणाले, या शताब्दी वर्षात पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची नावे समोर येत आहेत. यामुळे डोळे भरून येत आहेत. या लोकांनी जे तप केले, जो त्याग केला, त्या तपाला व त्यागाला न्याय द्यायचा असेल, तर देश टिकवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहण्याची गरज आहे असे मला वाटते.
कारण, संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने आयात केलेली मंडळी येतात. त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्या लोकांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात हेच कळत नाही. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. गंगा शुद्धच आहे. पण गंगेत येऊन मिसळणाऱ्या नाल्यामुळे ती प्रदूषित झाली आहे. त्यानुसार संघ परिवारही आयारामांमुळे प्रदूषित होईल अशी भीती मला वाटत आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची आक्रमणे झाली. अनेक संकटे आली. मंदिरे पाडली गेली. विद्यापीठे उद्ध्वस्त केली गेली. हिंदुत्वावर आघात केला गेला. पण संघाने सुनियोजितपणे त्याचा प्रतिकार केला. देशाची संस्कृती व आंतरिक सजीवता कायम ठेवली. यामुळे भारत देशाला कुणालाही संपवता आले नाही. एवढेच नाही तर स्वतः संघालाही तीनवेळा संपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला हा वारसा सांभाळून देशाला पुढे न्यायचे आहे.